जर मानसिक पातळीवर वस्तुस्थितीचा आपण जसाच्या तसा स्वीकार केला तर कुठेहि समस्या राहणार नाही परंतु इथेच प्रत्येकाचे घोडे पेंड खात असते.आपल्या मनाची रचनाच अशी आहे की जे काही आहे त्यात ते समाधानी नसते.सतत त्याला जे काही आहे त्यामध्ये बदल घडवून आणावयाचा असतो .मन ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करते तिथे तिथे ते समस्या निर्माण करीत असते .

 उदाहरणार्थ एखादा पक्षाघाताने आजारी मनुष्य बघितला तर तेवढ्यावरच आपले मन न थांबता याचे आता पुढे काय होईल आपल्याला पक्षाघात झाला तर मग आपण काय करू?अशा प्रकारचे कळत नकळत असंख्य विचार कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या मनात दाटी करतात .जरा विचार करा ,कुटुंब नोकरी जात पक्ष प्रदेश राज्य  राष्ट्र या प्रत्येक ठिकाणी मन काही ना काही समस्या निर्माण करीत असते कि नाही?तुम्ही आपल्या मनाचे निरीक्षण करा . मन निरनिराळ्या प्रसंगामध्ये कसा विचार करते ते पाहा म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा होईल .अापण समस्या कशा निर्माण करतो ते लक्षात येईल . अगोदर मनामध्ये समस्या निर्माण होते व नंतर ती बाह्य  जगतात अस्तित्वात येते . "मी"च्या प्रत्येक पातळीवर माझा फायदा कसा होईल हा विचार नेहमी मनात असतो.वसुधैव कुटुंबकम् असा जरी नारा केला तरी मन नेहमी संकुचितपणे विचार  करीत असते .मी ब्राह्मण मराठा दलित हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध या प्रत्येकामध्ये पुन्हा असंख्य जाती उपजाती पोटजाती वगैरे वगैरे .पुन्हा असंख्य राजकीय पक्ष व त्यांचे विचार त्यांचे फायदे तोटे हा गोंधळ आहेच .मी गोरा मी काळा आफ्रिकन आशियन युरोपियन युरेशियन अमेरिकन वगैरे भानगडी पुन्हा आहेत .त्यात पुन्हा अनेक राष्ट्रे व त्यांचे  नारे आहेतच .साधे सोपे समस्याविरहित जगणे , आहे त्या वस्तु स्थितीचा जसाच्या तसा स्वीकार करणे , हे आपल्या मनाच्या रक्तातच नाही असे आढळून येते . साधे सोपे सरळ जगणे आपल्याला माहीतच नाही असे आढळून येते .आणि म्हणूनच जी माणसे साधी सरळ व निरागस असतात त्यांच्याबद्दल आपल्याला आदर वाटतो .जर वस्तुस्थितीचा प्रत्येक क्षणी जसाच्या तसा स्वीकार केला तर अापण अस्तित्वात राहणार नाही अशी भीती बहुधा मनाला वाटत असावी. साधेपणा सरळपणा निरागसता याला काही वेळा बावळटपणा म्हणूनहि या मनाकडून हिणविले जाते .   स्व-अस्तित्व संरक्षण प्रेरणेतून मन असंख्य समस्या निर्माण करीत असावे .मन म्हणजे "मी"कारण "मी"लाओळखण्यासाठी दुसरे काही साधन आतातरी आपल्याजवळ उपलब्ध नाही .

कोणत्याही क्रियेमध्ये समस्या नसते .त्या क्रियेवरील विचारांमध्ये समस्या असते.

आहार निद्रा मैथुन वात्सल्य  प्रेम या क्रियांमध्ये समस्या नसते तर त्यावरील विचारांमध्ये समस्या असते.होय नाही असावा नसावा योग्य अयोग्य शक्य अशक्य करावे न करावे या प्रकारच्या असंख्य गुंतागुंतीच्या विचारातून समस्या निर्माण होतात . प्रत्येकाचे विचार ,विचार करण्याच्या पद्धती ,या प्रत्येकाच्या धारणेनुसार पुनः निरनिराळ्या असतात.  मन ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करते तिथे तिथे समस्या निर्माण करते , मग ती समस्या सोडवत बसते, आणि अशा प्रकारे ते बळकट होत जाते . ही दृढीकरणाची व पुष्टीकरणाची प्रक्रिया आहे . अनेकदा ब्रेन वाशिंग ची समस्या सांगितली जाते.आपल्याला नको असलेल्या संस्कारांच्या रोपणाला आपण ब्रेन वाशिंग असे लेबल लावतो .प्रत्यक्षात कमी जास्त प्रमाणात आपण तेच करीत असतो .प्रत्येक राष्ट्रात प्रत्येक प्रदेशात प्रत्येक धर्मात जाती व पोट जातीत विविध संस्कारांच्या मार्फत निरनिराळ्या पातळीवर कळत नकळत तथाकथित ब्रेन वॉशिंग होत नसते काय ?प्रत्येक व्यक्ती संस्था लेखक वक्ता धर्मगुरू त्याला हवे असलेले विचार जाणीवपूर्वक लोकांच्या मनात ठसवीत आरोपण करीत नसतो काय ?आपल्याला हवे असलेल्या विचारांचे रोपण म्हणजे योग्य संस्कार आणि नको असलेल्या विचारांचे  रोपण म्हणजे ब्रेन वॉशिंग हा काय न्याय झाला ? ------(एखादा म्हणेल की तुम्ही ही आता तेच करीत आहा.तुमचे म्हणणे बरोबर आहे त्याशिवाय माझ्या जवळ दुसरे कुठले साधन नाही . एवढाच फरक आहे की हे योग्य किंवा अयोग्य असे न सांगता ,हे करा किंवा हे करू नका असे न सांगता ,आपण काय करीत असतो त्याचे विश्लेषण मी करीत आहे ).------ यामुळे मन पुष्ट होत जात नाही काय ?साधे सोपे सरळ जीवन या मनाला माहीतच नसते .सतत वक्रता काटेकुटे डावपेच ,दुष्टता क्रूरता इत्यादींनी हे मन नेहमी भरलेले नसते काय ?समस्या बाहेर नाहीत तर त्या आत आहेत .मन हीच एक समस्या आहे . जर भूतकाळामध्ये अवगाहन केले नाही, त्याच्या आधारावर भविष्यकाळामध्ये मार्गक्रमण केले नाही, तर आपले अस्तित्व व तुष्टीकरण नष्ट होईल अशी मनाला भीती वाटत असते .निरनिराळ्या मार्गानी सतत मनाचे दृढीकरण होत असते . ज्याक्षणी स्व- अस्तित्वाची जाणीव नष्ट होते त्यावेळी परमोच्च आनंद अस्तित्वात येतो काही काळ का होईना मन पूर्ण स्तब्ध होईल म्हणजेच त्याचे अस्तित्व ज्यावेळी नष्ट होईल ,"मी"विरघळेल ,तेव्हा परमोच्च आनंद व समाधान असते असे आढळून येईल.असे आयुष्यातील क्षण आठवा कि जेव्हा तुम्ही झोपेत नव्हता तरीही तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती विचार नव्हते .त्या क्षणी मन अस्तित्वात नव्हते .तेव्हा परमोच्च आनंद नव्हता काय ?त्यावेळी तो क्षण टिकावा असेही वाटत नव्हते किंबहुना त्या क्षणाचे भानच नव्हते .त्यानंतर त्या ठिकाणी स्व-विसरामध्ये आनंद होता ही जाणीव झाल्यावर ,तो आनंद पुन्हा पुन्हा मिळावा अशी इच्छा निर्माण झाली आणि तिथेच समस्येला सुरुवात झाली.पुन:पुन: आणखी आणखी हे शब्द एकाच वेळी भूतकाळ व भविष्यकाळ दर्शवितात .त्यासाठी खटपटी लटपटी सुरू होतात आणि अनेक समस्यांना सुरुवात होते .समस्या हा "मी"निर्माण करतो आणि त्यालाच ती सोडविता येईल . जेव्हा मन स्तब्ध होते मनाचे अस्तित्व नष्ट होते त्याक्षणी परमोच्च आनंद  स्थिती असते .मनावर अलिप्तपणे (कारण दुसरे काहीही साधन नाही)देखरेख  करीत मनाकडूनच ज्यावेळी या सर्व प्रक्रियेचे  आकलन होते, (त्यालाच निवड शून्य जागृतता असे म्हणता येईल )तेव्हा केव्हा तरी आपोआप मन स्तब्ध होते .स्व विसर ही परमोच्च आनंद स्थिती असते .स्व-विसर अवस्थेत आपण वर्तमानात असतो . समस्या आपण निर्माण केली आहे त्याचे आपल्याकडूनच निरसन होऊ शकते .

५/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel