मुलांना घेऊन मालती जंगलात गेली होती. मुले झाडावर चढत होती. तेथील त्या प्रचंड वटवृक्षांच्या पारंब्यांना धरून वर जात होती. कोणी फुले गोळा करीत होती. कोणी फुलपाखरांना धरीत होती.

मालती एका शिलाखंडावर बसली होती. तेथून समोरची शेते दिसत होती. बाग दिसत होती. ओसाड जमीन लागवडीखाली आली. तेथे मळे फुलले. परंतु माझे जीवन? मी अशीच का राहणार? घनश्याम का लग्न करू इच्छित नाही? मी त्यांना कसे विचारू? माझ्या मनातील वेदना कोणास सांगू? तिचे डोळे भरून आले. तिला आईची आठवण आली. ती तेथे डोळे मिटून बसली होती. तो तिच्याजवळ हातात फुलांची माळ घेऊन घना उभा होता. तिने डोळे उघडले तो समोर घना! ती उठली. दोघे समोरासमोर उभी होती.

“मी माझी माळ आणली आहे; तुझी कधी होणार?” तो म्हणाला.

‘मी अश्रूंची माळ रोज गुंफीत असते. आताही तीच गुंफीत होते.” ती म्हणाली.

“मालती—”

“काय?”

“तू माझी जीवनसखी होणार ना?”

“मी कधीच झाली आहे. परंतु मी तुमच्या जीवनात अडगळ होऊ इच्छित नाही. माझी कीव नका करू.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel