“सध्या नको. आता कोठे अभ्यासाला सुरुवात केली आहे. आजवर प्रयोग करण्यात, भटकण्यात सारे आयुष्य गेले. एक काम तरी हातून पुरे होऊ दे. आई म्हणाली की दादाला मदत कर. आजवर सारा भार दादाने उचलला. माझ्या हातून ना झाली देशसेवा, ना कुटुंबसेवा.”

“हिंदुस्थानभर भटकून तू अनुभवाचे धन गोळा केले आहेस.” घना म्हणाला.

“परंतु ते संसारात थोडेच उपयोगी पडणार आहे? ‘प्रपंची पाहिजे सुवर्ण!” सखारामाने खिन्नपणे उत्तर दिले.

“भाऊ, हे आजारी ना आहेत? नको उगीच चर्चा.” मालती म्हणाली.

“तूच त्याच्याजवळ सारखे होलत आहेस!” सखारामाने टोमणा मारला.

“चुकले माझे.” ती हसून म्हणाली.

“मला आता जरा बरे वाटते.” घनाने सांगितले.

“आपण फिरायला जायचे का?” मालतीने प्रश्न केला.

“त्याला विचार.” सखाराम म्हणाला.

“तुमच्याने येववेल?” तिने विचारले.

“येईन. तुम्हा प्रेमळ बहीणभावांच्या संगतीत मला आनेदच वाटेल.” घना म्हणाला.

सायंकाळी तिघे फिरायला गेली. गावाबाहेर एक लहानसे सरोवर होते. सरोवराच्या काठी तिघे बसली. दूर कमळे होती. सायंकाळ झाल्यामुळे ती आता मिटत होती. सूर्याचे किरण सरोवरावर नाचत होते.

“आपण भाकरीचा खेळ खेळू.” मालती म्हणाली.

“आपण का लहान आता हे खेळ खेळायला?” सखाराम म्हणाला.

“खेळ केव्हाही खेळावे. खेळासारखे निष्पाप जगात काय आहे? मी येतो खेळायला.” असे म्हणून घनाने दगड गोळा केले. एक लहान दगड घेऊन त्याने तो पाण्यावर तिरकस फेकला. उड्या मारीत तो दगड गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel