( सायंकाळची वेळ असते. जवळपास सात वाजलेले असतात घरात शीतलचे आई-वडील आणि शीतल असते शितलचं स्वयंपाक करणं चालू असतं.)

 

शीतल:- (चुलीवरचा धूर डोळ्यात जात असतो) आई मला शाळेच्या नाटकात काम करायचयं.

 

शीतलची आई:- बरी हायंस नव्हं. काहीही काय बोलून राहिली. 

 

शीतल:- आई मला आवडतं नाटक करायला.

 

शीतलची आई:- अगं त्यापरीस अभ्यासात डोकं जास्त लाव जरा. 

 

शीतल:- आई एकदा बाबांना विचारून बघ ना.

 

(इतक्यात शीतलचे बाबा स्वयंपाक घरात प्रवेश करतात)

 

बाबा:- अयं, काय बोलणं चाललंय माय-लेकीचं?

 

आई:- काही नाही तिला म्हटलं जरा भाजीला मीठ निट टाक.

 

बाबा:- तुम्ही सांगायची गरज पडली व्हयं. शीतल तर भाजी छानच बनवती की.

 

शीतल:- बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय.

 

बाबा:- विचार की मंग.

 

शीतल:- बाबा शाळेतल्या नाटक स्पर्धेत मला भाग घ्यायचायं.

 

बाबा:- (दुर्लक्षित करून) ते ताट घ्या इकडं... (आई ताट पुढे करते.)

 

शीतल:- बाबा... (तिचं बोलणं अर्धवट तोडल्या जातं)

 

बाबा:- शीतले हे बघं पोरीन अभ्यास करावा फक्त. नाटकबिटक काय कामाच नाय.

 

शीतल:- पण बाबा ऐका तर.... 

 

बाबा:- हे बघं एकदा सांगितलं ना नाही म्हणून तर विषय इथेच संपला.

 

आई:- शीतले जा पाणी भरुन घे. 

 

(शीतल मनातून पूर्णपणे नाराज होते. चेहर्‍यावर तशीच उदासीनता घेऊन ती नळावर पाणी भरायला जाते.)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel