प्रिय मैत्रीण
आत्ता आठवलं. अशक्य शब्दाला तू फार मनावर घेऊन बोललीस. बरं झालं तू एकदाची बोलती झालीस. नाहीतर आपल्या स्वप्नातल्या आजवरच्या भेटींचा असा अर्धवट किंवा एकतर्फीचा प्रतिसाद जर सत्यात संपला असता तर न जाणो जीवाला किती घोर लागून राहिला असता. एकमेव दोघांचाच विश्व पत्रातून आता उलगडू लागलेलं मी गमावून बसलो असतो. पण तसं होणार नाही याची पूर्णतः खात्री आहे मला. तुला तुझ्या स्व-अस्तित्वाची जाणीव फार नकळत्या वयात झाली. कधी मग तुला असं वाटत जात असेल की, आता भरपूर जगून झालं; पण तसं कधीच नसतं. ज्या वयात जे हवं नको होतं ते माथी आलं यात तुझी चूक काहीच नव्हती. ना ती चूक नियतीची होती. तुला माहितीये, आपण अशा वेळी वेळेला दोष देतो. काळ फार अघोर आहे वगैरे..... वगैरे...... पण त्याच क्षणी तुला जर सागरी किनाऱ्यावर पावसाच्या सरींना नारळाच्या पानांवर अलगत पडताना ओंजळीत झेलता आलं तर...... तरच तो क्षण आयुष्याचा अविभाज्य घटक ठरतो. प्रेमाची भावनाही शून्य वाटून जाते त्या अविस्मरणीय प्रसंगात. तर मग एकदा स्वतःला सावरायला तू पुन्हा हो भावनाशून्य.... कल्पना पुन्हा कल्पना कर.......
तुझा मित्र
किरण पवार