आपल्या मनात जे विचार येतात, ज्या सुंदर सुंदर भावना मधून मधून चमकतात, त्यांना साठवून ठेवण्यासाठी, त्यांना मरू न देण्यासाठी आपण काय करतो, कोणती किंमत देतो, कोणता त्याग करतो ? आपणात अशी चाल आहे की, तीर्थयात्रा झाली की, त्या तीर्थयात्रेचे स्मरण म्हणून एखाद्या पदार्थाचा त्याग करावयाचा; म्हणजे ती ती वस्तू दिसताच, तो पदार्थ समोर येताच त्या यात्रेची- त्या पुण्य प्रसंगाची आठवण आपोआपच राहील. आपला आत्मा विचारांच्या क्षेत्रात सारख्या यात्रा करीत असतो व कधी कधी पवित्र स्थळी तो जात असतो. परंतु त्याचे स्मरण राहावे म्हणून आपण कोणत्या गोष्टींचा त्याग करतो ? ज्या वस्तूचा त्याग आपण करतो, त्या वस्तूच्या दर्शनाने आपणास पुन्हा त्या पावन अनुभवाची स्मृती होते. क्षणभर पुन्हा आपण परमेश्वराजवळ जातो. ज्या ज्या वेळेस श्रीरामकृष्ण फुले पाहात, त्या त्या वेळेस त्या पूर्वीच्या पावन व शिव अशा अनुभवांची त्यांना स्मृती होई व तो अनुभव अधिकच दृढ व अधिकच श्रीमंत होत जाई; त्या अनुभवात अधिकच गोडी व अधिकच रस उत्पन्न होई. अधिकस्य अधिकं फलम् क्षुद्र वस्तू व क्षुद्र गोष्टी यांच्या पसार्‍यात आपण इतक गुरफटून गेलेलो असतो की, आपणाला मिळालेल्या थोर व मोलवान अशा क्षणांची आपणास आठवणही राहत नाही. क्षुद्र वस्तूच आपणास प्राणासमान झालेल्या असतात. दगड उराशी बाळगून मोती फेकून देत असतो. उच्च अनुभवांची अशा रीतीने अपेक्षा व टेहाळणी आपण करीत असतो. अशांना ते थोर अनुभव अधिकाधिक कसे मिळावे व का मिळावे ? काकाला मोती कशाला ? बेडकाला कमळे कशाला ? गोचिडीला दूध कशाला ? मोठमोठ्या धडपडीनंतर एखादा किरण भाग्याने मिळतो, सद्विचार हृदयात स्फुरतो. परंतु त्याला हृदयात आपण कितीसे स्थान देतो ? त्या अनुभवांशी किती सत्यतेने वागतो ? तो अनुभव किती आपलासा करून घेतो, त्याला दृढ करतो ? आपणांपैकी बहुतेकांची जीवने वाळूचा डोंगर चढून जाणार्‍या मुशाफराच्या प्रगतीप्रमाणे असतात. तो मुशाफर एक हात चढतो व दोन हात खाली घसरतो ! त्याप्रमाणे आपणही जे मोठ्या कष्टाने मिळते, ते क्षणात गमावून बसतो. आपणाला काही लाभले होते, एखादा सत्किरण हृदयात आला होता, ह्याची आपली आठवणही पार बुजून जाते.

आत्म्याचे सुंदर जीवन- ते विसरून कसे बरे चालणार ? तिकडे दुर्लक्ष करून भागणारच नाही. आपल्या सभोवतालच्या पसार्‍यात, सभोवतालच्या कचर्‍याच्या ढिगात हीच एक अत्यंत महत्त्वाची व सत्यमय अशी वस्तू असते. तीच गमावून कसे बरे चालेल ? कधी कधी हा इंद्रियांचा आडपडदा किंचित् बाजूला झाल्यासारखा होतो व त्या पडद्याआड बसलेल्या त्या सुंदराचे- त्या परमेश्वराचे- अंधुक दर्शन झाल्यासारखे वाटते. मधून मधून तो असा डोकावतो व आपणाला मुकेपणाने बोलावीत असतो. परंतु हे क्षण वाढवावे असे आपल्या मनात येतच नाही. जरा दार उघडा की तो परमेश्वर आत येण्यास उभा आहे. दार जरा किलकिले करताच बाहेरची स्वच्छ हवा व स्वच्छ प्रकाश आत घुसतात. परंतु आपण दारे लावून बसतो. आत्मसूर्याचा अखंड प्रकाश आपण आपल्या जीवनात आणीत नाही. तो दृष्टीआडच राहतो व आपण अंधारातच चाचपडत रडतो व पडतो. त्या आत्मसूर्याला प्रकट होऊ दे. त्याला विरोध करू नका. या विविधतेच्या पाठीमागे असलेले जे एकम् सत्, जे सत्यम् शिवम् सुंदरम्, त्याला पुढे येण्यास अवसर द्या. एवढे करा म्हणजे तुम्हाला असे दिसून येईल की, जगातील वस्तुमात्राला आपल्या आत्म्याचे जीवनच नटवीत आहे, घडवीत आहे. जन्म वा मरण, सुख वा दु:ख, त्याच्याहूनही महत्त्वाच्या गोष्टी ज्ञान व अज्ञान, ह्या सर्वांची विल्हेवाट आध्यात्मिक शक्ती, आत्म्याची शक्ती हीच लावीत असते. ही आध्यात्मिक शक्ती सर्व वस्तूंना वाकविते, तापविते, आकार देते. ही शक्तीच सर्व वस्तूंचे मूल्यमापन करून हे त्याज्य, हे ग्राह्य, हे तुच्छ, हे उच्च, हे श्रेय, हे प्रिय असे ठरवीत असते. ही शक्तीच वस्तूचे अंतरंग दाखविते, वस्तूचा अर्थ समजून देते. तुम्ही काय शिकलात एवढाच प्रश्न नसून त्याबरोबर दुसरा एक प्रश्न आहे की, जे शिकलात ते दृढ करण्यासाठी, ते जीवनात आणण्यासाठी, ते जीवनात कायमचे असावे म्हणून काय किंमत दिलीत ? कोणता त्याग केलात ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel