परंतु जेथे सत्याचे हाल होत नाहीत तेथे सत्याचा प्रकाशही वाढत नाही. मग वाटते की, सत्याची पूजा करण्यापेक्षा, सत्यावर हल्ले चढविलेलेच बरे. सत्याच्या बाबतीत मूक राहण्यापेक्षा, सत्याची निंदा करणारे पत्करले. सत्याच्या उदोउदोपेक्षा सत्याला लाथ मारणे, बरे. कारण सत्य, सत्यशोधनाचा विचार जिवंत तरी राहील. सत्याचा विचार सदैव जागृत तरी राहील. मारण्यासाठी म्हणून का होईना कृष्णाचा ध्यास लागू दे. कृष्ण मरणार नाही, तो वाढतच जाईल. सत्याला मारू पाहणारे, छळू पाहणारे, सत्यावर उपकारच करतात. ते सत्याची प्रभा वाढवतात, सत्याला अमर करतात.

परवा एकदा एक युरोपियन म्हणाला, “देवाला ज्या वेळेस वाईट दिवस आलेले असतील, देशाची ज्या वेळेस दुर्दशा झालेली असेल, त्या वेळेस स्वत:चा स्वार्थ, स्वत:च्या आवडीनावडी, सर्व काही बाजूस सारून प्रत्येकाने देशसेवेला वाहून घेतले पाहिजे. देशाचे पडेल ते काम करावयास पुढे आले पाहिजे.” त्या वक्त्याच्या ध्येयाला वाहून घेऊन देशाला पुन्हा कळा चढविली पाहिजे.” त्या वक्त्याच्या म्हणण्याचा आशय असा की, “सुख, संपत्ती, सन्मान या वस्तू मिळविण्याच्या मागे लोकांनी लागू नये.” अमूर्त असे जे ध्येय त्याची जीवेभावेकरून सेवा करावयाची. त्याची सेवा करावयाची म्हणजे दारिद्रय पत्करावयाचे, कष्ट पत्करावयाचे; त्याची सेवा करावयाची म्हणजे भोग सोडावयाचा, सुख सोडावयाचे व मरावयाचे; आणि इतके करूनही कदाचित् अपयशही यावयाचे. ध्येयासाठी अशी ही किंमत द्यावी लागते. या ध्येंयाकडे जाण्याने माझे व इतर सर्वांचे अपरिमित कल्याण होणार आहे, हाच एक विचार ध्येयाला पुजणार्‍या माणसाचे मन पोलादी बनवीत असतो, म्हणून हृदयात महनीय आकांक्षा धरा, क्षुद्र भूक न धरता मोठी भूक बाळगा; क्षुद्र वस्तूकडे हृदय जाताच कामा नये; दृष्टी वळताच कामा नये. कमळ चिखलात असो वा सुंदर सरोवरात असो, त्याची दृष्टीवर सूर्याकडे असावयाची.

संन्यासी वैराग्यासाठी, अनासक्तीसाठी, पावित्र्यासाठी तळमळतो. आपण त्याचप्रमाणेच ज्ञानासाठी, विद्येसाठी, सत्यशोधनासाठी, न्यायासाठी, सामर्थ्यासाठी तळमळू या. अंधारात पडलेली मुले प्रकाशासाठी ओरडत असतात; सहाय्य मिळावे म्हणून ओरडत असतात. आपणही या मुलांप्रमाणे   प्रकाश, उध्दार, प्रकाश, सहाय्य असे ओरडू या.

तमसो मा ज्योतिर्गमय
असतो मा सद्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय

असे तळमळून, तडफडून आपण म्हणू या. प्रकाशाचा एक किरण, एक तिरीप कोठून येते का- चला भिरिभिरी हिंडून पाहू. ओरडा व झगडा. जर्मन महाकवी गटे मरताना म्हणाला, “आणखी प्रकाश, आणखी प्रकाश.”   अंधारात मुले मदतीसाठी धावा करीत आहेत, त्यांना प्रकाश व सहाय्य आपण नेऊन देऊ या. नेऊ देऊ अशी आशा करू या. कारण आपल्याजवळ असेल तर आपण देणार ? आपण स्वस्थ बसणार का ? मुले भुकेने तडफडत असता आईबाप का हात जोडून बसतील ? माना ढोपरात घालून बसतील ? आईबाप धडपड करतील व तुकडा घेऊन येतील. आपणही धडपडून प्रकाश मिळवू या व तो वाटू या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel