स्वयंसेवक होऊन चार जणांनी एकत्र येणे, समुदायरूप व्यक्ती होणे व कार्यभार उचलणे- हा जयिष्णू हिंदुधर्मातील विशेष होय. समाजसेवेसाठी व्यक्तीने सामुदायिक व्यक्तित्व पत्करावयाचे व स्वत:चे व्यक्तित्व जणू विसरावयाचे. समुदायाचे हातपाय आपण व्हावयाचे. परंतु प्रत्येक कार्य सिध्दीस जाण्यासाठी आजूबाजूच्या विशाल समाजातही तशा प्रकारची हालचाल, तशा प्रकारचे विचारवारे असावे लागतात. यासाठी अल्पसंख्याक संघांनी व आश्रयांनी बहुसंख्य अशा समाजाचे शत्रू बनून काम करू नये तर सेवक बनून काम करावे. शिव्याशाप देऊन काम करू नये, तर त्यांचे शिव्याशाप सहन करून काम करावे. एका चळवळीला यश येण्यासाठी इतर अनेक चळवळी निघाव्या लागतात; व मग या चळवळीचा परस्पर उपयोग होतो, एकमेकांस आधार मिळतो, फायदा मिळतो. हिंदुस्थानात औद्योगिक शिक्षण देण्यास भरपूर फंड नव्हते असे नाही. फंड भरपूर जमले, जमतील; परंतु आजुबाजूच्या समाजात एकंदर औद्योगिक वातावरणच मुळी कमी, साहस कमी, औद्योगिक दृष्टी कमी- ही गोष्ट औद्योगिक शिक्षणाच्या बाबतींतील मुख्य अडचण आहे. शिक्षण व प्रगती यांच्यामध्ये प्रमाण ठरलेले आहे. अदलून बदलून, आलटून पांलटून दोन्ही गोष्टींना निश्चयपूर्वक पुढे रेटीत नेले पाहिजे. या सर्व गोष्टी व समाजाला उच्च शास्त्रीय शिक्षणाची कितपत जरूरी आहे, ही गोष्ट यातही प्रमाण आहे. उद्योगधंदे नसतील तर शास्त्रीय शिक्षण तरी कशाला ? आणि हे सर्व प्रश्न पुन्हा सर्वसंग्राहक समाजाच्या उत्साहावर अवलंबून असतात. समाजाच्या उत्साहावर समाजाच्या गरजा अवलंबून असतात. समाजाचे कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणती संघटना पाहिजे आहे, वगैरे गोष्टींचा विचार सेवा-संघाची सामुदायिक उत्साहशक्ती करीत असते. संघाचा सामुदायिक उत्साह ! एका ध्येयाने प्रेरित झालेल्या संघाचा उत्साह ! सांघिक उत्साहाची ही नवीन भावना, ही नवीन कल्पना, सर्वांच्या हृदयात आज आधी पेटली पाहिजे. ही भावना जागृत करा, विकसित करा, वाढवा, पेटवा, ह्या भावनेला नेहमी कार्यमग्न ठेवा. सामुदायिक शक्तीने आज प्रथम पुढील गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाचा अभाव ही मुख्य बाब प्रथम हाती घेतली पाहिजे. जनतेची मनोभूमी नीट चांगली नांगरून टाकण्याची जरूरी आहे. या कामाला रावांनी व रंकांनी, छोटयांनी व मोठ्यांनी, सर्वांनी हातभार लावला पाहिजे. हे काम करण्यासाठी भिकारी बना, दारिद्र्याच्या परम वेदना सहन करा. आपल्याच फक्त पोरांबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न नाही, तर सर्वांच्या, ही गोष्ट अशी आहे की, जीत सर्वांचे हित तेच आपले हित, सर्वांची जरूरी तीच आपली जरूरी, असे झाले पाहिजे. आपणाला आपल्या संस्कृतीत चैतन्य ओतावयाचे आहे. वस्तूंकडे व्यापक दृष्टीने बघावयास, सर्व दृष्टींनी बघावयास शिकावयाचे आहे मानवजातीला जे जे ज्ञान आहे, त्याचे आपण स्वामी झाले पाहिजे. कोपर्‍यात कुंपण घालून राखून ठेवलेले थोडेसे ज्ञान, तेवढ्याने आता संतुष्ट राहून चालणार नाही. या बाबतीत अल्पसंताषीपणा नको. ज्ञानाची भूक वाढतच जावो. शास्त्रसंशोधनासाठी, निरोगी व धष्टपुष्ट जीवनासाठी, हितकर विचार करण्यासाठी, व्यापक दृष्टीसाठी, आपण लायक आहोत की नाही ? या गोष्टीसाठी आपणात हिंमत व कुवत आहे की नाही ? असेल तर ती स्वत:ची शक्ती, स्वत:ची लायकी सिध्द करून दाखविण्याची वेळ आली आहे.

या अज्ञानरुपी शत्रूच्या किल्ल्यावर हल्ला चढविण्यासाठी आपण कोठून निघावे ? हा हल्ला धैर्याने प्रथम धार्मिक बाजूकडून धर्मसंस्थांनी सुरू करावा. ज्या देशांतून बौध्दधर्म आहे, त्या देशात बौध्दभिक्षूंच्या विहाराभोवतीच शाळा, ग्रंथालये, संग्रहालये, औद्योगिक शिक्षण यांच्या संस्था उभारलेल्या असतात. धर्माच्या ओलाव्यानेच या गोष्टी त्या देशात वाढतात. आपल्या देशातही धर्मानेच या अज्ञानावर हल्ला का चढवू नये ? दक्षिण हिंदुस्थानातील प्रचंड मठ व मंदिरे यांनी बुध्दविहारांप्रमाणे हे ज्ञानदानाचे व ज्ञानसंवर्धनाचे काम का सुरू नये ? या श्रीमंत देवस्थानांनी असे उदाहरण का घालून देऊ नये ? नवीन उच्च शिक्षण का वाढवू नये ? ब्राह्मण हा पुराणप्रिय असतो, कूपमंडूक असतो, अशी शंका घेतां? अशी भीती तुम्हाला वाटते ? परंतु अशी शंका का यावी ? आपणास जर देशकालानुरूप योग्य विचार करता येतो, तर ब्राह्मणांत वा देवस्थानांच्या व मठांच्या संतमहंतांत ती पात्रता नसेल का ? जगातील कोणत्याही राष्ट्राला जी जास्तीत जास्त विशाल व अत्यंत प्रगल्भ अशी दृष्टी घेता येईल, ती दृष्टी भारतातील सर्व बंधू घेतील, घेऊ शकतील, अशी अपेक्षा आपण धरू या. अशी श्रध्दा बाळगल्यानेच आपण खरेखुरे हिंदुधर्माचे अनुयायी होऊ हा नवीन विचार आहे, नूतन आरंभ आहे. हे पहिले आरंभकर्ते, नवपंथप्रवर्तक हिंदू आपण होऊ या. ‘ हिंदू ’ हा भव्य व थोर शब्द स्वत:ला लावून घेण्यापूर्वी तो शब्द लावून घेण्यास आपली पात्रता आहे का, त्या शब्दावर आपला हक्क आहे का, याचाही विचार करा. आपल्या देशाचे, आपल्या धर्माचे नाव स्वत:ला लावणे - मी अमक्या देशाचा व अमक्या धर्माचा असे म्हणणे - पोरखेळ नाही. ही गंभीर गोष्ट आहे. त्या पुण्यभूमीचे व पुण्यधर्माचे नाव स्वत:ला लावणे म्हणजे एका नवीन पंथाची आपण पवित्र दीक्षा घेणे होय; ते नाव आपण स्वत:ला लावणे म्हणजे एका नवीन पंथाची आपण पवित्र दीक्षा घेणे होय; ते नाव आपण स्वत:ला लावणे म्हणजे आपण स्वत:ला प्रेमाने निष्ठापूर्वक त्यांच्या सेवेस बांधून घेणे होय; स्वेच्छेने श्रमावयास व झिजावयास आपण सिध्द झालो, याची ती खूण होय.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel