गुरु सामर्थ्य असेल तर चमत्कार वाटाव्या अशा गोष्टी घडून येतात. आजची हि कथा गुरु शक्ती विषयी आहे. श्री गुरूंचा पाठींबा असेल तर किती अशक्य प्राय गोष्टी घडून येतात याची कल्पना येईल. आपल्या महाराष्ट्राला अशा थोर सद्गुरूंची देणगी लाभली आहे. नवनाथ, चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माउली पासून एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आताच्या चालू शतकात म्हणायचं झालं तर स्वामी दत्तावधूत असे भरपूर सिद्ध-संत या भूमीला लाभले. सगळ्या संतांची नावं घेण शक्य नाही म्हणून त्यांची क्षमा मागतो आणि पुढे जातो. हिमालय, गिरनार, नर्मदा अशा पवित्र स्थानांमध्ये जेवढे सिद्ध महात्मे आहेत तेवढेच या महाराष्ट्राला लाभले आहेत. संतांच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर मुलखानपेक्षा खूप नशीबवान आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. मी (क्रिष्णा), एडमीन रोहित आणि आमचे दोन मित्र देवदत्त आणि आशुतोष असे सहज त्र्यंबकेश्वर क्षेत्री फिरायला गेलो होतो. नाशिक पासून सुमारे २६ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आद्य ज्योतिर्लिंग आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी त्र्यबंकेश्वर हे जगातील एकमेव भूलिंग आहे. या भूलिंगातून सतत पाण्याचा एक प्रवाह होत असतो. ब्रम्हा-विष्णू-महेश आणि भागीरथी गंगा यांच एकत्रित दर्शन ह्या ठिकाणी होत. त्र्यंबकराजाला भेट देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही ज्या omni गाडी ने परत येणार होतो तिच्या काही जागा भरायच्या बाकी होत्या त्या भरे पर्यंत आम्ही तिकडेच थांबलो होतो. त्या गाडीचे नेहमीचे प्रवासी साधू आम्हाला भेटले, बाबाच म्हणा हव तर त्यांना. श्यामवर्णी, एकदम सडक अंगकाठी, पंढरी शुभ्र दाढी, भगव नेसलेले, अतिशय तापट असं त्याचं वर्णन. गाडी भरायला वेळ असल्या कारणामुळे ते जरा फेरफटका मारायला गेले होते तेव्हा गाडीच्या चालकाने त्या साधू बाबांन बद्दल एक गंमत सांगितली कि, या बाबांचा अख्या त्र्यंबक मध्ये कोणी नाद नाही करत. मागच्या कुंभमेळ्यात हे बाबा तथाकथित संत आसारामबापुंच्या अंगावर सर्वांसमक्ष थुकले होते. त्या बाबांचं नावं काही आठवत नाही असो त्यांनी सांगितलेली त्यांचा गुरूंची हि कथा गुरु शक्तीची आज तुम्हाला सांगत आहे. बाबा आमच्या गाडीत माझा समोरच बसले होते. अध्यात्माविषयी बोलणं चालू होत. बोलता बोलता जनार्दन स्वामींचा विषय निघाला.आम्हाला जनार्दन स्वामींविषयी फारशी माहिती नव्हती म्हणून बाबा त्यांचाविषयी बोलायला लागले. बाबा म्हणाले, "जनार्दन स्वामी माझे गुरु. जनार्दन स्वामींचा महिमा काय सांगू, सगळ्या जातीत सिद्ध पुरुष होऊन गेले मराठ्यांमध्ये कोणी सिद्ध पुरुष नव्हता म्हणून जनार्दन स्वामींनी मराठ्यांच्या घरी अवतार घेतला." बाबा पुढे म्हणाले," फार मोठे गुरु होते ते. त्यांनी खूप साधना करून घेतलीय माझ्या कडून. गुरु शक्तीच आहे माझा जवळ बाकी काही नाही." त्यांचा बद्दलचा एक अनुभव सांगण्यास बाबांनी सुरवात केली. बाबा म्हणाले," माझे गुरु आता काही हयात नाहीत पण त्यांचे दृष्टांत अजूनही अनुभवता येतात. काही वर्षांपूर्वी मी (बाबा) कोल्हापूर ला गेलो होतो तेव्हा तिथे एक माणूस मला भेटला बहुतेक ओळखीचाच होता...मला विचारलं,बाबा तुम्ही इथे कधीपासून आणि होतात कुठे इतके दिवस त्यावर मी म्हणालो, सध्या त्र्यंबकेश्वर मध्ये असतो थोड्या दिवसांसाठी कोल्हापूर ला आलोय. मी त्याची विचारपूस केली त्यावेळेस तो म्हणाला,२ वर्ष झाली पाउस नाही जेमतेम चालू आहे सगळं काहीतरी उपाय सांगा ह्या वर. मी म्हटलं, जा शेत नांगरून घे पेरणी कर, पेरणी झाल्यावर मी येतो तेव्हा ७ मुलीना जेवायला घाल. जनार्दन स्वामी सर्व काही ठीक करतील. ऐन उन्हाळ्याचे दिवस होते ते. मे मधलं रण-रणत उन्ह डोक्यावर तरी हि त्या माणसाने दोन दिवसात संपूर्ण शेत नांगरून काढलं आणि पेरणी केली. पेरणी झाल्यावर ठरल्याप्रमाणे मी गेलो. मी त्याला माझा समोर त्या मुलींना जेवायला देण्यास सांगितले व त्यांच जेवण झाल्यावर मी जेवायला बसलो. जेवून झाल्यावर ताटात जसजसा मी हात धुवायला लागलो तसतसा बाहेर मुसळधार पाउस पडला. बाबा मला म्हणाले खोटं वाटेल तुम्हा मुलांना पण माझं जेवण चालू होत त्यावेळेस आभाळ अगदी स्वच्छ होत. तो माणूस माझे पाय धरायला लागला बोलला, बाबा तुम्ही धन्य आहात. मी म्हणालो, मी काहीनाही केलं हि सर्व जनार्दन स्वमिंची कृपा आहे. गुरु शक्ती पाठीशी आहे माझ्या. तिच्यामुळे झालं हे नाहीतर मेच्या कडक उन्हाळ्यात कसला आलाय पाउस. त्या माणसाला आशीर्वाद देऊन मी निघालो." पुढे काही विचारणार इतक्यात गाडीच्या चालकाने गाडी थांबवली. बाबा गाडीतून उतरून त्यांचा वाटेने निघून गेले. जाताना जोरात म्हणाले,"जय जनार्दन."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel