चैत्र शुद्ध नवमीस रामनवमीचे व्रत केले जाते. या दिवशी मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा जन्म झाला. श्रीरामाच्या जीवनाचे वर्णन विविध धर्म ग्रंथांमध्ये करण्यात आले आहे, परंतु वाल्मिकी रामायणामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. रामायण महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकींनी केली. या महाकाव्यामध्ये २४ हजार श्लोक, पाचशे उपखंड व अर्थसहित सात कांड आहेत. ज्या वेळी दशरथ राजाने पुत्रेष्ठि यज्ञ केला होता, तेव्हा त्यांचे वय ६० हजार वर्ष होते. रामायणानुसार दशरथ राजाने पुत्र प्राप्तीसाठी पुत्रेष्ठि यज्ञ केला होता. हा यज्ञ ऋषि ऋष्यश्रृंग याच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ऋष्यश्रृंग ऋषींच्या वडिलांचे नाव विभाण्डक होते. एकदा नदीमध्ये स्नान करताना त्यांचा वीर्यपात झाला. ते पाणी एका हरिणीने पिले, अशा प्रकारे ऋषी ऋष्यश्रृंग यांचा जन्म झाला होता. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाचा जन्म चैत्र मासात शुक्ल पक्षातील नवमी तिथीला, पुनर्वसू नक्षत्र कर्क लग्नामध्ये झाला. त्यावेळी सूर्य, मंगळम शनी, गुरु आणि शुक्र ग्रह आपापल्या उच्च स्थानामध्ये विद्यमान होते तसेच लग्नामध्ये चंद्रासोबत गुरु विराजमान होते. भरतचा जन्म पुष्य नक्षत्र तेसेच मीन लग्नामध्ये झाला. लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म आश्वेषा नक्षत्र व कर्क लग्नामध्ये झाला. त्यावेळी सूर्य आपल्या उच्च स्थानामध्ये विराजमान होते. तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसमध्ये वर्णन आहे की, भगवान श्रीरामाने सीता स्वयंवरामध्ये शिवधनुष्य उचलले आणि प्रत्यंचा चढवताना धनुष्य तुटले. परंतु वाल्मिकी ऋषी रचित रामायणामध्ये स्वयंवराचे वर्णन करण्यात आलेले नाही. रामायणानुसार जेव्हा श्रीराम व लक्ष्मण ऋषी विश्वामित्र यांच्यासोबत मिथिला नगरी पोहचले तेव्हा विश्वामित्रांनी जनक राजाला श्रीरामाला शिवधनुष्य दाखवण्यास सांगितले. तेव्हा श्रीरामाने खेळण्यासाठी ते धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा चढवताना धनुष्य तुटले. राजा जनकाने प्रण केला होता की, जो कोणी हे शिवधनुष्य उचलेले त्याच्याशी माझ्या मुलीचा विवाह करण्यात येईल. श्रीरामचरित मानसनुसार सीता स्वयंवराच्या वेळी भगवान परशुराम तेथे उपस्थित होते. परंतु रामायणानुसार सितेसोबत लग्न झाल्यानंतर जेव्हा श्रीराम आयोध्येला पोहचले, त्यानंतर परशुराम तेथे आले आणि त्यांनी श्रीरामाला आपल्या धनुष्यावर बाण चढवण्यास सांगितले. श्रीरामाने बाण चढवल्यानंतरच परशुराम तेथून निघून गेले. श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्यांचे वय २७ वर्षांचे होते. दशरथ राजाला त्यांना वनवासासाठी पाठवायचे नव्हते प्रांती ते वचनबद्ध होते. जेव्हा श्रीरामाला वनवासात जाण्यापासून रोखण्यासाठी कोणताही उपाय शिल्लक नव्हता तेव्हा, दशरथ राजाने श्रीरामाला मला बंदी बनुवून स्वतः राजा होऊन हे राज्य सांभाळ असे सांगितले होते. जेव्हा लक्ष्मणला श्रीरामाच्या वनवासाची बातमी समजली तेव्हा ते खूप क्रोधीत झाले आणि आपले वडील दशरथ राजाविरुद्ध युद्ध करण्यास सज्ज झाले.परंतु श्रीरामाने समजून सांगितल्यानंतर लक्ष्मणचा क्रोध शांत झाला. श्रीरामाला वनवासात त्रास होऊ नये म्हणून दशरथ राजाने त्यांना धन-धान्य, ऐश्वर्य, रथ, सामान देण्याचा निर्णय केला, परंतु कैकयीने या गोष्टीला विरोध केला. आपले वडील दशरथ राजाच्या मृत्यूचा आभास भरताला पहिलेच एका स्वप्नाच्या माध्यमातून झाला होता. स्वप्नामध्ये दशरथ राजाला काळे वस्त्र परिधान केलेले त्याने पहिले होते.त्यांच्यावर पिवळ्या रंगाची स्त्री प्रहार करत होती. स्वप्नामध्ये राजा दशरथ लाल फुलांचा हार घालून लाल चंदन लाऊन गाढव जुंपलेल्या रथातून वेगाने दक्षिण (यमाची दिशा) दिशेकडे जात होते. हिंदू धर्म ग्रंथामध्ये ३३ कोटी देव असल्याची मान्यता आहे. परंतु रामायणाच्या अरण्यकांडातील चौदाव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकामध्ये ३३ देवच सांगण्यात आले आहेत.यानुसार बारा आदित्य, आठ वसु, अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे एकूण तेहतीस देव आहेत. सीताहरण केल्यानंतर रावणाला जटायू नावाच्या पक्ष्याने अडवण्याचा प्रयत्न केला होता. रामायणानुसार जटायुचे वडील अरुण आहेत. अरुण सूर्यदेवाच्या रथाचे सारथी आहेत. हे तर सर्वांनाच माहिती आहे की, लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्यानंतर क्रोधीत झालेल्या रावणाने सीताहरण केले, परंतु स्वतः शूर्पणखाने रावणाला त्याचा सर्वनाश होईल असा शाप दिला होता. रावणाची बहिण शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिन्न होते. तो कालकेय नावाच्या राजाचा सेनापती होता. जेव्हा रावण विश्वविजयासाठी निघाला तेव्हा कालकेय राजासोबत त्याचे भंयकर युद्ध झाले. या युद्धामध्ये रावणाने विद्युतजिन्नचा वध केला. तेव्हा शूर्पणखाने मनातल्या मनात रावणाला शाप दिला की, माझ्यामुळे तुझा सर्वनाश होईल. ज्या दिवशी रावणाने सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठवले होते.त्याचदिवशी रात्री ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार देवराज इंद्र सीतेसाठी खीर घेऊन गेले होते. पहिल्यांदा इंद्राने अशोक वाटिकेतील सर्व राक्षसांना संमोहित करून झोपी घातले. त्यानंतर सीतेला खीर अर्पण केली. ती खीर खाल्यानंतर सीतेची भूक-तहान शांत झाली. सीतेचा शोध करत असताना श्रीराम आणि लक्ष्मणाने पहिल्यांदा कबंध नावाच्या राक्षसाचा वध केला. एका शापामुळे कबंध राक्षस झाला होता. श्रीरामाने त्याचे शरीर अग्नीला समर्पित केल्यानंतर तो शापमुक्त झाला. कबंधानेच श्रीरामाला सुग्रीवाशी मैत्री करण्यास सांगितले होते. श्रीरामचरित मानसनुसार समुद्राने श्रीरामाला लंकेत जाण्यासाठी मार्ग देण्याचे नाकारले होते, तेव्हा लक्ष्मण खूप क्रोधित झाले होते. परंतु रामायणामध्ये दिलेल्या माहितीनुसार भगवान श्रीराम समुद्रावर क्रोधित झाले होते आणि त्यांनी समुद्रातील पाणी आटवण्यासाठी बाणही सोडले होते. तेव्हा लक्ष्मण आणि इतर लोकांनी श्रीरामाला शांत होण्याची विनंती केली. सर्वांनाच माहिती आहे की, समुद्रावर सेतू निर्माण करण्याचे काम नल नावाच्या वानराने केले होते. कारण पाण्यात टाकेलेली कोणतीही वस्तू बुडणार नाही असा त्याला शाप होता. वाल्मिकी रामायणानुसार नल देवतांचे शिल्पी (इंजीनियर) विश्वकर्माचे पुत्र होते आणि ते स्वतः शिल्पकलेत निपुण होते. आपल्या याच कलेने त्यांनी समुद्रावर सेतू निर्माण केला. रामायणानुसार समुद्रावर सेतू बांधण्यासाठी पाच दिवस लागले होते. पहिल्या दिवशी वानरांनी १४ योजन, दुसर्या दिवशी २० योजन, तिसर्या दिवशी २१ योजन, चौथ्या दिवशी २२ योजन आणि पाचव्या दिवशी २३ योजन सेतू बांधला होता. अशाप्रकारे एकूण १०० योजन लांबीचा हा सेतू होता. एकदा रावण महादेवाला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला होता. त्याठिकाणी नंदीला पाहून रावणाने नंदीच्या रुपाची खिल्ली उडवली आणि त्यांना वानरासारखे तोंड असलेला असे संबोधले. तेव्हा नंदीने रावणाला शाप दिला की, वानारांमुळेच तुझा सर्वनाश होईल. रामायणानुसार जेव्हा रावणाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कैलाश पर्वत उचलला होता. तेव्हा देवी पार्वती भयभीत झाल्या होत्या आणि त्यांनी रावणाला शाप दिला की, तुझा मृत्यू एखाद्या स्त्रीमुळे होईल. श्रीराम आणि रावणाचे अंतिम युद्ध चालू होते तेव्हा इंद्रदेवाने श्रीरामाला आपल्या दिव्य रथ दिला होता. या रथावर स्वार होऊन श्रीरामाने रावणाचा वध केला. रामायणानुसार ज्या सोन्याच्या लंकेमध्ये रावण राहत होता, ती लंका पूर्वी रावणाचा भाऊ कुबेराची होती. विश्वविजयासाठी निघाल्यंतर रावणाने कुबेराला युद्धात पराजित करून लंका व पुष्पक विमान हस्तगत केले. एकदा रावणाला पुष्पक विमानातून भ्रमण करताना,एक सुंदर स्त्री दिसली. ती स्त्री विष्णूला पतीच्या रुपात प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होती. रावणाने तिचे केस पकडले आणि तिला सोबत चलण्यास सांगितले. त्याच क्षणी त्या तपस्विनीने स्वतःचा देहत्याग केला आणि रावणाला शाप दिला की, एका स्त्रीमुळे तुझा सर्वनाश होईल. साभार : हिंदि नियतकालिक
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel