दामाजी पंतांनि जगविले ब्राह्मण काही दुकळात । गायकवाड तर रक्षिति ब्राह्मण लाखो असल्या काळात ॥ध्रु०॥

तीनशे तिसांवर वर्षे लोटली दुर्गादेविच्या काळाला । फार दिवस पर्जन्यच गेला आन्न मिळेना बाळाला ॥

दामाजीपंताच्या लागले ब्राह्मण द्वारी लोळाला । रक्ष रक्ष महाराज समर्थ सर्वास आला निर्दाळा ॥

त्या समई कथोर फोडुनी पंती जगविले सकळाला । बेदरास कळताच धुतोड शिपाई आले आवळाला ॥

चल बे बम्मन म्हणुन ओढिता अश्रु लागले गाळाला । कैद करून नेताक्षणी पडले संकट त्रिभुवनपाळाला ॥चा०॥

महाराचे सोंग विठोबांनी स्वता घेउनी ॥ धान्याचे द्रव्य त्या बाच्छायास देउनी ॥ पंतांच्या पोथिमधे ती रसिद ठेउनी ॥

राहिले विठोबा पंढरीस येउनी ॥चा०

दामाजीपंताच्या धावण्या असा धावला विपळात । तसा म्हाळसाकांत रक्षितो गायकवाड ह्या भूतळात ॥१॥

सत्राशे चोवोसात दंगा होळकरांनी अति केला । पंचविसामधे दरोबस्त अगदिच पहारे पाउस गेला ।

दीड शेराचा दुकाळ पडला कहर वाटला दुनियेला । दिसंदिवस बेबरकत जहाली सुखोत्पत्ति नाही रयतेला ॥

ब्राह्मण गेले उठुन मजलोमजली खुब ठेला । बडोद्यात पोचला तो जगला न पोचल्या वाटेस मेला ॥

धर्मपुरुष गायकवाड प्रेमळ क्षमा शांतिने भरलेला । तेव्हापसुन प्रारंभ सिध्याला हजारो ब्राह्मण जपलेला ॥चा०॥

चाळीस वर्षे वाटितात खिचडी सदा ॥ म्हणून न जाती ब्राह्मण देशी कदा ॥ दिवसात प्रहरभर पडे मेहनत एकदा ॥

मग सार्वकाळ आनंद हसती गदगदा ॥चा० कुटुंब सुद्धा प्रपंच करती गर्भिणी होति बाळात ।

तिही महिन्याच्या मुलास खिचडी मिळत्ये असे आले आढळात ॥२॥

वेदशास्त्रसंपन्न पुराणिक योग्य ज्योतिषी हर्दास । टाळ विने करताळ मृदंगी त्यात एखादी सुरदास ॥

सार्वकाळ भजनात घालती कदा न शिवती नर्दास । घुंगुर बांधुन पायी नाचती ध्याति पुंडलिकवर्दास ।

चित्रे मूर्ती करण्यात कुशळ जे वैद्य जिंकिती दर्दास । तर्‍हे तर्‍हेच्या करून नकला नकली रिझविती मर्दास ॥

ब्रह्मचारि मांत्रीक तपस्वी घेउन सवे शार्गिदास । मोहरा पुतळ्या रुपये तयांना देति शालजोड्याफर्दास ॥चा०॥

ह्यापरी ब्राह्मण समुदाय फार जगविला ॥ पुरुषार्थ करुन संकटकाळी दाविला ॥ वैकुंठी अचळ हा धर्मध्वज लाविला ॥

वंशास वश मार्तंड करुन ठेविला ॥चा०॥

येवढेच विश्रांतिला राहिले स्थळ पश्चमच्या राहाळात । कीर्तवान खावंद असले नाही मराठे मंडळात ॥३॥

विश्वकुटुंबी श्रीमंत ते तर तूर्त प्रजेला अंतरले । गायकवाड आहेत म्हणुन हे समस्त ब्राह्मण सावरले ॥

तानसेन पंथाचे गवय्ये तेहि प्रभूनि आवरले । कडी तोडे हातात दुपेटे लाल जरीचे पांघरले ॥

पहिलवान पंजाबी ज्यांचे दंड सदा मुंढे फिरले । हरहमेश कुस्त्याच विलोकुन इतर मल्ल जागीच विरले ॥

नायकिणी आणि कसबिणी शाहिर नेहमी बडोद्यामधे ठरले । पावे पगाराशिवाय बक्षिस कसबी लोक ह्याने तरले ॥चा०॥

कल्याण ईश्वरा असेच यांचे असो ॥ आनंदभरित चिरकाळ गादीवर बसो ॥ कधी अलोभ गंगुहैबतीवर नसो ॥

महादेव गुणीचे कवन मनामधे ठसो ॥ चा० प्रभाकर कवी भ्रमर गुंतला पहा कर्जाच्या कमळात ।

द्रव्यकृपेचा प्रकाश पडल्या सुटून जाइल स्वकुळात ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel