आशा भोसले

गेली सुमारे ६० वर्षे रसिकांना असीम आनंद देणार्‍या शतपैलू, चिरतरुण गायिका!

 

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही,  त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही. असा अद्वितीय आवाज म्हणजेच अर्थात आशाताई भोसलेंचा आवाज. महाराष्ट्राला लाभलेलं हे सुरांचं देणं. जुन्यांसाठी तितकंच जुनं, मुरलेलं आणि नव्यांसाठीही तितकंच नवं, ताजं.

मंगेशकर कुटुंबातला त्यांचा जन्म, मा. दीनानाथांचा मिळालेला वारसा, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचं मार्गदर्शन व त्यांची साथ-या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. आशाताईंनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लतादीदी, शमशाद बेगम, गीता दत्त अशा बड्या गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणं अवघड होतं. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं, स्वत:ला सिद्ध करण्याचं फार मोठं आव्हान आशाताईंपुढं होतं. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी,  मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांचा सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारलं.  त्यांनी ते स्वबळावर, आत्मविश्वासानं, यशस्वीपणे पेलूनही दाखवलं.

१९५७-५८ हे वर्ष आशाताईंचं होतं. सचिन देव (एस.डी.)बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असं‘य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशकं आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचं कोंदण दिलं. एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यातल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं.

ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. १९६० च्या सुमारास नय्यर यांचं संगीत असणारं ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणं; १९६५ चं ‘जाईंये आप कहां’ (मेरे सनम); १९६८ मधलं ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी -अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.

आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे १९७१ चे कारवॉं चित्रपटातील गीत, १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे -ही गाणी आशाताईंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळंच जमून आलं. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

हिंदीबरोबर आशाताईंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोेघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजूनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी सगळंच विलक्षण!

त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार; ते गीतकार; त्या अभिनेत्री आणि आशाताईंचा आवाज- या सर्वांच्या परस्परसंबंधांचे सं‘यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.

हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्र्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी महंमद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज ऋषिकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी  आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.

नाच रे मोरा-आईए मेहेरबॉं-दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत)-तनहा तनहा यहां पे जीना-जिवलगा राहिले रे दूर घर माझे-रंग दे मुझे रंग दे- सांज ये गाकुळी-जानम समझा करो-मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्र्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीतं, मराठी-हिंदी चित्रपट गीतं, नाट्यगीतं, गझल, लावणी, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात. हे शतपैलुत्व अलौकिक आहे, एकमेवाद्वितीय आहे.

कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, दुबई, स्वीडन आदी अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेलं काम, ‘राहुल अँड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचं काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. काही महिन्यांपूर्वी, वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेंड्स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसं स्थळ-काळ-वेळाचं बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचंच बंधन नाही.

राष्ट्रीय पुरस्कार, असंख्य फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.

आशाताई  मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्‍या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणार्‍या ,किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणार्‍या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत. म्हणूनच आजच्या स्पर्धेच्या युगात एखाद्या दूरदर्शन वाहिनीवरील स्पर्धेत (रअँलिटी शोमध्ये)‘महागुरू’ची भूमिका निभावताना त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. एखाद्या स्पर्धकाला स्पर्धेबाहेर काढण्याचा निकाल देताना आजही त्यांचे डोळे पाणावतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel