एका शेतकर्‍याचा एक कोंबडा होता. एकदा त्याला असे समजले की, आज आपला मालक आपल्याला मारून खाणार. तेव्हा तो आपण शेतकर्‍याच्या हाती सापडू नये म्हणून इकडे तिकडे लपून बसू लागला. त्याने आपल्या बरोबरीच्या कोंबड्यांच्या माना कापताना आपल्या मालकाला फार वेळा पाहिले होते तेव्हापासून त्याला भिती वाटत होती. त्याला जवळ बोलावून त्याची मान कापावी म्हणून शेतकर्‍याने बरेच प्रयत्‍न केले. पण कोंबडा आधीच सगळे जाणून असल्याने शेतकर्‍याच्या गोड बोलण्याला फसला नाही. जवळच एका पिंजर्‍यात त्या शेतकर्‍याने एक बहिरी ससाणा ठेवला होता. तोहा प्रकार पाहून त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे, तू किती मूर्ख व कृतघ्न आहेस ! आपल्या मालकाने मारलेली हाक ऐकून घेणं तुझं कर्तव्य आहे.' या बाबतीत माझं वागणं कसं आहे हे लक्षात घे. मला दुसरी हाक मारण्याची वेळ मालकाला येत नाही.' त्यावर तो कोंबडा म्हणाला, 'खरंच पण माझ्यासारखी तुझी मान कापून तुझ्या मांसाचे तुकडे तव्यावर भाजून खावे या कारणासाठी जर तुला जवळ बोलावलं तर तू माझ्यासारखाच लपून बसशील, याबद्दल मला अजिबात संशय वाटत नाही.'

तात्पर्य

- परिस्थितीप्रमाणे माणसाच्या वागणुकीत बदल होणे साहजिक आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel