''आज येथें तूं ज्या संस्थेंत नोकर आहेस तेथें नाहीं का गुलाम ? जगांत केवळ निरपेक्ष, निरुपाधिक स्वातंत्र्य रंगा नाहीं. थोडेफार तरी आपण कशाचेतरी गुलाम असतों.''

''नयना, उशीर होत आहे. मला नको दिल्ली. स्वातंत्र्य येऊं दे. मग मी दिल्लीला रंगवायला जाईन. तूं ये युरोपांत जाऊन. पत्र पाठवीत जा.''

''तूं सारखा उशीर होईल उशीर होईल म्हणत आहेस. मी जावें अशी का इच्छा ?''

''नाहीं नयना. तूं बस. जन्मभर येथें बस. मी कंटाळणार नाहीं. परंतु दिल्लीची बात नको. मला दिल्लीचा सम्राट् नको बनवूं; तुझ्या खोलींतील झाडूवाला बनव. तो माझा मोक्ष आहे.''

बराचवेळ तेथें मूकता होती. शेवटीं नयना उठली.

''रंगा, नयना साधी मुलगी आहे. मला ना ध्येयवाद, ना राष्ट्रवाद, ना कांहीं. मी साधी सांसारिक दृष्टीची मुलगी. क्षमा कर. तूं मोठा हो. स्वतंत्र भारतांत तुझी कला पचंको, चमको. तोंपर्यंत ती अधिक अर्थवाही कर; खोल, गंभीर, समृध्द कर. स्वतंत्र भारताला तुझी थोर कला अर्पण कर. येतें मी. रंगा, नयनाला विसरुन जा. मी जमीनीवरुन चालणारी. दारिद्र्यांतील वैभव मला दिसत नाहीं. शंकराच्या विभूतींतील वैभव गौरीशंकरावरील गौरीलाच कळणार, तितक्या उंचीवर जाणार्‍या स्त्रीलाच कळणार. तूं महान् आहेस, मी लहान आहें. येतें रंगा. सुखी अस. पोटभर जेवत तरी जा. माझी शपथ आहे तुला. तुझ्या आईची शपथ. येतें रंगा. रागवूं नको. क्षमा कर मला'' असे म्हणून नयना गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel