परस्त्रीचे हो पाईं जिवाची खोरी होइल तत्क्षणास । चांडाळ कोण दुर्जन करील अभिलाष ? ॥धृ०॥

गुजरण चंद्रवदनी नार । चंद्र गवळी तिचा भ्रतार । त्याच्या द्रव्यासी नाहीं पारावार । पांचशा गवळ्यांचा सरदार ॥चाल॥ त्या पांचश्या गवळ्यांचीं वेगळीं घरं । आणीक गाईम्हशींचीं खिल्लारं । संगें घेऊनिया दलभार गेला चाकरी । घरीं टाकुनी चंद्रवदनी प्रियकर प्यारी । धन्य ईश्वराची कळा कीं चांगुलपण, तिला रूप दिलें भगवंतानं । तिच्या स्वरूपाचें पडे चांदणं राजमंदिरीं । जशी परी रूपसुंदरी ल्याली अलंकार उशन (?) वसन भरजरी । कटि कसुन पिवळा पितांबर नेसुन कीं पदर सावरी । बुट्टेदार कंचुकी ल्याली सुबक जरतारी । लखलखाट चमके ज्वाहार, गळ्यामधिं शोभे चंद्रहार । आणिक जडिताचा करून शिणगार करून परोपरी । माथां मुदराखडी कळाकुसरी । कानीं करंजफुल, बाळ्याबुगडया, हातामधिं तोडे, गोठपाटल्या । पायींही पदी तोरडया ल्याली गुजरी । अनवठ बिचव्याचा झनकार नाद किलकारी । सांडुन शिरीं भवराची छाया (?) सासुला म्हणती घेऊनी या या । जाते दहि दूध विकाया उदापूर नगरीं । दहा पांच मिळून आम्ही जातो नगरच्या नारी । ती सासु म्हणे गुजरीस, ‘नको जाऊं उदापुर नगिरास । तिथें उदेभान राजाचा पुत्र मवास’ ॥१॥

गुजरण चंद्रावदन राजस कह्या प्राणीणा (?) झाली उदास । तिनें जायाचा घेतला सोस । उदापूर नगरी कच्ची सहा कोस ॥चाल॥ दह पांच मिळुन गजघाट शिरीं घेऊन दह्याचा माठ । येऊन पोहचला एकच ताट उदापुर नगर । चवकांत मारी किलकारी गुजरीनार । आठपेठा गल्लोगल्लीं, दही घ्या म्हणून सांगू लागली । तिच्या स्वरूपाची मात काकली गेली दुरवर । दुररस्तो जमला  थाट पहाती जनसार । वाणी उदमी दुकानदार आणिक मोठाले सावकार । लागली जखम काळजापार, झाले कीं चुर । गपगपा झाकले नेत्र पाहतां नूर । जग म्हणती, अरे भगवंता, अशी निर्मिली सुंदर ही कांता, नार गवळ्याची ही पतिव्रता रूपसुंदर । धन्य धन्य प्राणी असला इचा भ्रतार । राजदरबारीं पोहचली मात अशी एक गुजरी आली शहरांत । तिला पाहून या पडली भ्रांत नको घरदार । ऐकून राजपुत्रास धरवेना धीर । हालकार करून तयार बोलावून आणिली गुजरी नार । तिचें रूप पाहुनिया अनवार राजकुमार । ‘दह्यासहित ज्यानीचें मोल बोल करार । आम्ही सौदागर व्यापारी सौदा करूं चाल महालास । जें मागशिल तें देऊं, नाहीं खुमास’ ॥२॥

गुजरण म्हणे रे राजाला, ‘ऐका । सव्वा लाख दह्याचा पैका । बोल ऐकून लागला चुरखा । ज्यानीचें मोल सांगूं काय मूर्खा ॥चाल॥ आहे पातिव्रत्या माझा धर्म सांगते तुला । धर कांहीं शरम, अशा गोष्टीनें भोगशिल कर्मघात जीवाला । तूं येकुता येक पुत्र आहेस राजाला । ईश्वरी दया तुजवरी सातीजणी स्त्रिया राजमंदिरीं कीं जैशा सिंहलद्वीपच्या परी विषयभोगाला । आग लगो, हे परद्वार व्हावें कशाला । जळो जळो हें चांगुलपण कशाला दिलें भगवंतानं । संचिति काय लिहिलें ब्रम्ह्यान कळेना मजला । हें संकट कसें ओढवलें, सांगूं कोणाला । आतां सांगते, गोष्ट कर जतन करावी नार जीवाला घतण, अशा गोष्टीनें पावले पतन, मुकले प्राणाला । हें पुरतेपणीं शोधुन पहावें मनाला । लंकापति रावण, पहा तयाची गती झाली कोण । राज्य बुडविलें, सीतेच्या पायीं कुळक्षय झाला । कीचक द्रौपदीला लुब्ध झाला जीवासी को नांव बुडवील पतिव्रतेस डाग लावील त्याचा कुलक्षय होईल जाइल भंगाला । इंद्राला पडली भगें सर्व अंगाला’ । अशी बोलुन गुजरी नार निघून चालली मुळ ठायास । ऐकून जखम लागली राजपुत्रास ॥३॥

राजा म्हणे, ‘ऐक नारी, तुजवर नाहीं करीत बळजोरी । खुशीचा सवदा करुं परद्वारीं । तुला सोन्यामधिं मढवीन सारी ॥चाल॥ नारी, ऐक सांगतो तुला, बोल येकदां करूं दे सल्ला तुझ्या ज्यानीचा पाहूं मासला चाल एकांतीं । मला चैन पडेना, फेड मनाची भ्रांती । बहु रोजी स्वीकि (?) रूपरंग पाहुन झालों मनामध्यें दंग, तुझा आमचा भ्रांती । बहु रोजी स्वीकि (?) रूपरंग पाहुन झालों मनामध्यें दंग, तुझा आमचा घडेल कधिं संग ? वाटती खर्‍याती (?) तूं नको करूं अनमान चतुर गुणवती । रूप स्वरूप तुझी ही काया । सांडून प्रेमसुखाची छाया येक दिवशीं अंतीं जाइल वाया होइल माती । ही दोन दिवसाची जानी ही नवनवती । तूं सोडून अवघी लाज तर काय होशील आमची भाज । या नगरीचं करिशील राज्य संगातीं । पट्टराणी करीन, छत्र धरीन तुजवरतीं । हें पुरतें पहा शोधून मनाला, मग तूं कर मान्य वचनाला । साती स्त्रिया लावीन सेवेला तुझ्या ग दिनरात्रीं । मम संगत अवघे भोगावी संपत्ती । तूं चांगुलपणांत राजसवाणी काय गवळ्याची घरजिनगाणी । जंगलवस्ती कोण्या ठिकाणीं कंटक रहाती । तिथें कैचें सुखसोहळे विलास होती’ । नाना परी बोधिली ऐके ना झाली उदास । मग उतावळपणीं तिला जाऊन धरली पदरास ॥४॥

गवळण म्हणते, ‘राव राजींद्रा । विनंती ऐका सुखचंद्रा । तुला काय कमी आहे भाग्येंद्रा ? । सोड जाऊं दे, नको धरूं पदरा ॥चाल॥ माझे संगातणीं पहातील वाट, ओसरुन जाईल अवघा हाट, शिरीं धरला दह्याचा माठ, काय करूं याला ? दिनमान होइल अस्तमान घरीं जायाला । किती बोलू वारंवार ? अरे मूर्खा कांहीं धर सुमार, किती सांगशील तरी पडीभार गोष्टी मजला । आग लागो तुझे धनद्रव्याला, हवें कुणाला ? । तुझ्या घरीं राजसंपत्ती महाल मुलुख सर्वयु (?) पर तियाची बिशाद संगूं काय तुजला । माझ्या घरीं निवंता नाहीं धनद्रव्याला । तुझ्या घरीं हत्ती घोडे लाव लष्कर पालखी पागा दास चाकर । माझ्या घरीं गाई म्हशींचीं खिल्लारं गणीत नाहीं त्याला । हिर्‍याची लागली खाण, कोण पुसतो माणिक-मोत्याला ? । तुझ्या पट्टराण्या सातीजणी तशा माझ्या दासी कुणबिणी नित्या राबती सदा निशिदिनीं घरकामाला । मी जशी राधा गोकुळीं तसे सुख सोहळे भोगी त्याला कर्दनकाळ माझा भ्रतार । पांचशा गवळ्यांचा सरदार राजदरबारीं कुल अखत्यार । त्याचा बोलबाला तुजसारखे चाकर आहेत सेवेला’ । अशी ऐकून लागली जखम राजपुत्राला हा जिव गेला तर जाऊं हात लावीन इच्या मालास ॥५॥

तिला बळजोरी हस्तकीं धरलीं । परसद्वारीं नेऊन बसविली । चंद्रवदनी मनीं घाबरली । पाव गिरिजापति, लज्जा हरली ॥चाल॥ रोजना पदरा । भयभित झाली, कापे थरथरा । प्रवास कठीण आहे ईश्वरा, बरी गत नाहीं । वनांत जशी व्याघ्रानं अडविली गाई । भक्त कैवारी शंकर भोळा करुणा आली कणवला । झाला सुवर्णाचा कावळा आला त्या ठायीं । भगवान तिनं वळखला लागली पायीं, मग नेत्रीचें अंजन काढी, पत्र लिहिलं बहु तातडी । कावळ्यापुढें ठेविली घडी, धांव ह्या समयीं । प्राणपति मला भेटवी आणुन लवलाही । पत्र घेऊन काग उडाला एक दिवसांत, जाऊन पोहचला पत्र दिलें चंद्रगुजराला वाचून पाहीं । समजला सर्व वर्तमान बसल्या ठायीं । त्या घडी करून तयारी भर मजलीची करून स्वारी येऊन पोहचला उदापुर नगरीं सकळ शाही । शहरामधीं नाकेबंदी केली ठायीं ठायीं । पांचशे गवळी घेऊन संगें चंद्रगुजर येउनि अंगें रायापुढें होउनि नि:संग बोलला कांहीं । ‘निर्वाण गुजरीसाठी करीन लढाई’ । चंद्रहंस बोलावून आणला राजसभेस । जाऊं दे सोड गुजरीला, नको लावू दोष ॥६॥

मग बोले राजकुमार ‘गवळ्या, पहा पुरता सुमार । गुजरी नाहीं तुला देणार, लखाखित आहे खड्‌गाची धार ॥चाल॥ तीन हातांचा नेम निर्धार । ज्याची फत्ते होईल समशेर । त्यांनी न्यावी गुजरी नार घराकारण’ । असा सभेमधीं बोलला राजनंदन । खड्‌ग घेऊन अतिलवलाही म्हणे, ‘अरे गवळ्या, सावध होई’ हातामधिं हात मारले घाई करुन संधान । तीन हात ढालेवर चुकवले गवळ्यानें । गवळी उठतां पडली भ्रांत एक हातांत करावा घात येऊन गुजरीनें धरला हात ‘द्यावा सोडून । हा एकुलता एक पुत्र राजाकारण’ । उदेभाग राजा-नृपती चंद्र गुजराची करी विनंती, ‘बरी आज मेहेर केली मजवरती दिलें जिवदान । ही गुजरी माझी कन्या गुणनिधान’ । त्याला पोशाख दिला भरजरी । मोत्या-पवळ्यांनी ओटी भरी, करी बोळवण । त्या दिवशी मुक्काम केला बागामधीं जाऊन । गुजरी गेल्यावर राजपुत्रास लागला ध्यास । अदघडी पडेना चैन झाला उदास ॥७॥

गेला घेउन गुजरी नार । लागली जखम काळजापार । फुंद आवरेना विषय अनिवार । प्राण द्यावया केला निर्धार ॥चाल॥ गेला उठुनी माडीवर अंगामधिं घातलं बखतर, तेला मधीं भिजवून सारं अग्न पेटवला । धडधडा चेतूं लागला, कंठ सोकला । मग येउन सदरेम्होरं पहाती अवघे लहानथोर, म्हणती राज्य बुडविले घर, प्राण सोडिला । नगरामधीं अकांत झाला कहर वर्षला । प्रेत पुत्राचें पाहून नयनी शोक बहु केला मायबापांनीं । ‘बरी ईश्वरा केलीस करणी, कुलक्षय झाला । हा पुत्र नव्हें दुष्मान, यानें कसा वाद साधिला’ । राजकुमार मृत्यु पावला, बातम्या गेल्या चंद्रगुजराला । गुजरीसहित परतुनि आला. राजसभेला । म्हणे, ठीक नाहीं झालें, आग लागली दर्याला’ । मग चंद्रगुजर समजून चित्तीं । बोले गुजरी, ‘तयाच्या संगें जावें सति । सांगतों तुजला, जनामधिं लौकिक होइल सांगायला’ । तिला जायाची आज्ञा दिली पतिचरणास येउन लागली, मग संसारीं उदास झाली पदर टाकिला । तिनें जाउन मांडी दिधली त्याच्या उशाला । नगराबाहेर केली खायी सातीजणी स्त्रिया आल्या त्या ठायीं त्यामधीं आठवी गुजरी पाही । करी गलबला । रामराम बोलूं लागली त्या वेळेला । उडी घालति येउन एक एक रडति अवघे नगरचे लोक दु:खामधीं बहु झाला शोक पाहे काय त्याला (?) या विषयापायी बहुजण मुकले प्राणाला । दादू गोपाळा कवी मोरू मोती अण्णाजी म्हणे, राज्य दिलं उदेभानानं चंद्रगवळ्याला । सात जन्म भ्रतार पुढें होइल गुजरीला । कवी विठ्ठल गुणीजन म्हणे ऐक चतुरास । पुतळीने कथा सांगितली भोज राजास । पर अस्त्रीच्या हो पाईं जिवाची खोरी होईल तत्क्षणास ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel