जाते सासर्‍या, कां तरी कष्टी निजला ?
अंत:करणापासुन रजा द्या मजला ॥धृ०॥
रसिक रसेल्या प्राणसख्या, या जवळी ।
जगा ज्योत मी सुंदर राजसबाळी ।
काढ मुखांतुन अधर वदन कवटाळी ।
तुझि आठवण, घातली कुसंबी चोळी ।
रडत फुदत ह्रदय धरून कवटाळी ।
तुझि प्रीत तोडिना मी कवणे काळीं ।
अक्षयी रहाते, असा ईस्वर कोठें पुजिला ॥१॥
जाते समयीं आलें पुसायासाठीं ।
दोन तर्‍हेच्या सांग छबेल्या गोष्टी ।
सद्‌गदित होऊन धरावें पोटीं ।
चैन पडल की काय गेल्यापाठीं ।
आवड तुला पाह्याची रे मला मोठी ।
कुठवर वर्णूं ? प्राण उरला कंठीं ।
द्वारी तुमचा मैत्र कीं कुजबुजला ॥२॥
प्राणवल्लभा, असुन पराची जाया ।
गोउन वचनीं कशी लाविलिस माया ? ।
जसा कर्दळी कोंब तशी तुझी काया ।
या उपरांतिक कधीं गवसल भोगाया ? ।
चंचल वृत्ती शांत करावी सखया ।
कवळुन धरिते, मुखीं घालते विडिया ।
सख्या तुझे धारानीं प्राण हा झिजला ॥३॥
बहुत प्रकारें आर्जवीत मैत्राला ।
दोहो महिन्यांचा खचित वायदा केला ।
पिवळा पीतांबर अपहस्तकीं नेसविला ।
देउन अलींगन घालवीत गेला ।
बाळा बहिरुचेंकवच विषाचा प्याला ।
गावुन वचनीं अग्नींतुन निघाला ।
धोंडीराज म्हणे चातुर ऐकुन रिझला ।
तुकाराम विश्राम जिवाचा भजला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel