अहो मुशाफर, घर सोडुन तुम्ही आला प्रवासामधीं ।
निजा स्वस्थ, थकला असाल कीं पथ चालतां पदीं ॥धृ०॥
चांगुलपणा विशेष अप्रतिम हें वय नूतन असे ।
पती गेले टाकून परदेशीं, येतिल संशय नसे ।
काय जगासी कारण अपला स्वधर्म अपणा दिसे ।
बोलूं नका भलतेंच, भासतें तुम्हां लागलें पिसें ।
इंद्रपदा इच्छुन राज्य करूम म्हणशी स्वलाभमिषें ।
तपसामर्थ्याविण तुल तें प्राप्त होईल कसें ? ।
वाटचे वाटसरू तुम्ही ।
पडतसा व्यर्थ कां भ्रमीं ? ।
राहिला परके आश्रमीं ।
विषयाचे अनुक्रमी लुब्ध होउनी अहो गुणनिधी ।
बरळतसा हें काय गोष्ट घडणार नाहीं जी कधी ॥१॥
जातां गांवावरून अधिं ज्या गृहीं चंद्र पाहिला ।
तें घर चुकलें असाल, येथें व्यर्थ येउन राहिला ।
विषयअंध होऊन बोलतां तरी कसे भलतिला ? ।
मी नाहीं बाहेर निघतां पडियेले दृष्टी कुण्या सवतीला ।
तूर्त आहे माहेरीं, सभवते भाऊबंद चौकीला ।
रात्रंदिवस जपतात उभे न राहूं देती गल्लीला ।
लौकिक वडलांचा आहे ।
येवढाच मोठा संशये ।
न घडे मशिं तुमचा स्नेहे ।
धरून मनामधिं भये चालते लवुन भजुन मी अधीं ।
याउपर मज न कळे कपाळीं काय लिहिलें विधीं ॥२॥
कपाळ फुटकें पुर्वजन्मीचें कोण पाप संग्रहीं ।
असा पणामधें टाकुन गेला तो भ्रतार निर्दयी ।
कोण जिवाची सखी केली असल तिचे आग्रहीं ।
गुंतुनिया वचनास राहिला म्हणुन पडला अशा संशयी ।
किंवा होउन संन्यासी फिरतो अलख म्हणत अक्षई ।
कुळिवंत स्त्रियांच्या रिती ।
स्वामीचरण वंदिती ।
व्यभिचारपणा निंदिती ।
या सुकुळीं निश्चिती निर्मिल्या मर्यादेच्या हादी ।
न भरतां ही आली जवळ वाटते आयुष्याची अवधी ॥३॥
मध्यस्थ घालुन दुसरी भाषणें करितां नाना परी ।
असे स्त्रियांसी फासूं शिकला करुन कवायत बरी ।
यापेक्षां सायास न प्रयत्न उदंड केले जरी ।
घडे प्रीत येकदां पूर्वींच्या ऋणानुबंधें खरी ।
चतुर अढळला म्हणून राहविले दुसरे दिशीं मंदिरीं ।
न कळे उद्यांची घडि काय येईल ह्रदयमंदिरीं ।
कल्पुन तुम्हां इतुके ।
चतुराइ करूं कौतुकें ।
भाषण म्या केलें मुखें ।
आज भोगिला सुखें, असा नाहीं चतुर अढळला कधीं ।
होनाजी बाळा म्हणे, धन्य एक तूं ज्ञानाची निधी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel