येणें जाणें का रे वजिंले सख्या माझे घरीं ?
तुला मी काय बोलले तरी ? ॥धृ०॥
प्रीत होती तुझी माझी तेव्हां जें चलन वळण हें कसें ? ।
तुला मजविण क्षण करमत नसे ।
दिवसांतुन शतवेळ मजकडे येत होतां राजसा ।
अतां कां मन निष्ठुर मज फारसें ? ।
मी स्वरुपावर लुब्ध होउन कि रे तुजभोवत फिरतसे ।
भुकेली धनद्रव्याची नसे ।
इतकें असून चांडाळा आणसी दूषण माझे शिरीं ॥१॥
बहुत प्रयत्नें स्नेह उभयतां आहे ऐता जाहला ।
आतां नको अंतर देऊं मला ।
संतापामधें शब्द एखादा असन बोलले तुला ।
तोच तुज राग वाटतें आला ।
दगलबाजी तुशीं नाही करून पु नि संशय आपला ।
शपथ वाहते, एकांतीं चला ।
असत्य वाटेल तरी सख्या घे लेख लिहुन मज करीं ॥२॥
मी वेडी, मजला कळतें काय हें तुज मुळापसुन ठाउकें ।
तुझ्या संगतीने वर्ततें सुखें ।
तुजविण मज नावडती जिवलगा आणिक पुरुष पारखे ।
येत जा तुम्ही पहिल्यासारखे ।
विषयाचें लाविलें वेड हें त्वा मलाच इतुकें ।
आतां बोलत जा हसल्या मुखें ।
कशासाठीं धरिलांत अबोला रागें भरून मजवरी ? ॥३॥
सोड अलेला राग जिवाला, चरणिं डोइ ठेविते ।
अणिक जिव अपला संकल्पिते ।
आजपासुन सांगितलें ऐकुन हवी तशी वागते ।
परंतु एक ऐका सांगतें ।
तुम्हि न जावें परकीकडे येवढें द्या हो वचन मागतें ।
खचित सांगा मजला काय तें ।
होनाजी बाळा म्हणे, बोलणें येथुन आतां पुरे करी ।
समजलों राग नाहिं अंतरीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel