जोंवर धरिली जगाची आस । तोंवर परमात्मा दूर खास ॥ परमात्म्याची प्राप्ति । न होई राखता विषयासक्ति ॥ जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले तरी घातासी आले ॥ विषयी एकजीव झालो जाण । सुटता न सुटे आपण जाण ॥ मान , अपमान , जगाचे सुख -दु :ख । हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥ अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण । हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥ सुख -दु :ख , विपत्ति -आपत्ति , । ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥ आत्मनिश्चय बाणल्यावांचून । माया न हटे न सुटे जाण ॥ आता करी शूर मन । मायेसी हटवावे आपण ॥ जैसें जैसें बाहेर दिसलें । त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥ एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण होते समाधान ॥ ज्याच्यांत मानावें मी सुख । त्याच्यातच उदभवतें दु :ख ॥ नराचा होय नारायण । जर न चुकला मार्ग जाण ॥ जेथे ठेवावी आस । त्याचे बनावें लागतें दास ॥ देह तो पंचभूतांचा । त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥ मी तुम्हांस सांगतों हित । दृश्यांत न ठेवावें चित्त ॥ दृश्य वस्तु नाशिवंत असते । भगवत्कृपेने समाधान येतें ॥

परिस्थिति नसे बंधनास कारण । असे आपलेच मनाची ठेवण ॥ देवास पाहावें ज्या रीतीनें । तसाच तो आपणास दिसतो जाण ॥ विषयाचा नाही झाला जोंवर त्याग । तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥ आपलें आत्यंतिक हित । हेंच खरा स्वार्थ जाण ॥ चित्तीं जे विषयापासून सुटले । ते आनंदासी आले ॥ रामनाम प्रेमयुक्त चाले धणी । त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥ द्रव्यदारावर्जित जाण । ही खरी संताची खूण ॥ सृष्टि पाहावी भगवदाकारी । प्रेम ठेवील त्याचेवरी । त्याला नाही दुसरी सरी ॥ आल्यागेल्यास द्यावे अन्नदान । मुखानें भगवंताचें नाम । ह्रदयांत रामाची प्रीति । यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥ न धरावी जगाची आस । तोच होऊ पाहे रामदास ॥ नामांत संत । नामीं भगवंत ॥ वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥ जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥ अगरबत्ती जळून गेली । परि सुवासाने राहिली । तैसे रामचरणी झाले जे लीन । तेच खरे जिवंत जाण ॥ संतचरणीं झाला लीन । त्याला भाग्यास नाही दुजें उणें ॥ संताची संगति । भगवन्नामानें साधते ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel