सकलयुक्त प्रवीण जिवाजीपंत शेखदार । तुम्हांवर बाकी निघाली म्हणोन तुम्हांस देहगांवास पाठविलें । तर देहेगांवीं राहून । विषय शेट व लोभाजी नाईक । यांचे बुद्धीस लागोनी भवसमुद्र तारावयाची भूल पडली । यामुळें कामाजी महाजन व मनीराम देशमुख तुम्हांस साह्य होऊन । तुमच्या निजस्वार्थाची खराबी केली । बुधाजी पाटील मोकदम । मुफसल्लाकीर्द होऊन म्हणों लागले कीं । कानडखिंड व तोंडापूर हे दोन्ही मातबर असतात । श्रवण खरीप व कीर्तन रबी पिकावयाची होती । ती ममताई आवानें हातीं लागूं दिली नाहीं । यासी उपाय केला पाहिजे । खावंदांपाशीं भागवतराव दिवाण । तो गीताबाईचा पुत्र राजयोगी । याची भेटावयाची तजबीज । वैराग्यस्वामी यांचे हातें व्हावी । प्रथम पश्चात्तापपंत । आपुले स्वाधीनच आहेत । त्यांजपाशीं येणें । ते तुझ्या वाणीचा हवाला घेतील । ते तुम्हांस मोकळे करतील । पुन्हा देहेगांवास व गर्भपुरास पाठविणार नाहींत । त्वां लिहिलें जे तूर्तच यमाजीपंतांची तलफ होणार । त्याची कांहीं तलफ माघारी फिरत नाहीं । त्याजबरोबर हुजूरच्या सनदा आहेत । म्हणून सांगितल्यावर हुकूम करणें । गैर न करणें । एका जनार्दनीं शरण । हा आशिर्वाद जाबचिठी ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel