समस्त राजकार्य धुरंधर । विश्वासनिधी । राजमान्य राजश्री । गजानन पंडित । द्विमत अपर्णाकांता ।

तालुके कैलासगिरी । तहाजी बाजी शेकदार । परगणे कर्म आचरण । सरकार ब्रह्मांड नगर । लोली प्रवाहे ।

अभयपत्र दिधलें कीं । तुमचे बाबे विवेक देसाई येऊन हुजूर विदित केलें कीं । दक्षिणाधिपति राजश्रीं यमाजीपंत कमाविसदार । यांचे धास्तीनें तमाम गांवची कीर्द बुडाली । त्यास येरवी पूर्वी । संपूर्ण तीर्थव्रतें । जप अनुष्ठानें ।

दानादि केलीं । परंतु गांवची कीर्द अबादी होईना । यास्तव अभयपत्र । सादर केलें कीं ।

त्रिकुटाचल शिखरीं । भ्रमरगुंफा सिंहासनीं । श्रीगुरुराव आहेत । त्यासी शरण जाऊन ।

आतां ज्ञानाची विचारणा करावी । म्हणजे श्रीगुरुराव । नामाचें निशाण देतील ।

तें देहगांवचें मुख्य चौबारा उभारा । कामक्रोधादिक षड्‌वैरी । आपणावर दगा करितात ।

तरी त्यांची पाळद राखून । इकडे निरोप कळवावा । म्हणजे त्यांशीं धरून आणून ।

त्यांचा शिरच्छेद करावयास येईल । परंतु लिहिल्याप्रमाणें वहिवाट करावी ।

म्हणजे आम्ही सरकारांत अर्ज करूं । ज्ञान वैराग्य हुजरे । आपले रखवालीस पाठवूं । कळावें एका जनार्दना शरण ।

हा आशीर्वाद हें अभयपत्र ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel