१८८२
ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला
त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला.
इंदूरला श्रींचे बरेच दिवस वास्तव्य झाल्यामुळे श्रींचे नाव जिकडे तिकडे पसरले. ते जेथे जेथे रहात तेथे तेथे भजन, नामस्कारण, अन्नदान सतत चालू असे. अनेक प्रांतीचे लोक त्यांच्याजवळ समाधान पावत व परत जाताना ’नाम ’ घेऊन जात. याच सुमारास गोविंद अनंत कुलकर्णी ( आनंदसागर ) यांचे कुटुंब इंदूरला राहण्यास आले. दहाव्या वर्षी गोविंदाचे वडील वारले. थोडी फार लिखाई करून आपले व आईचे पोट भरण्याची पाळी गोविंदावर आली. वडील वाचीत असत तो दासबोध गोविंदा वाचून त्याचे मनन करीत असे. पंधराव्या वर्षी दासबोधातील ’शुचिष्मंता ’ च्या समासाचे वाचन करीत असताना गोविंदाच्या वृत्ती तल्लीन झाल्या. असा कोणी सिद्धपुरुष मला भेटेल का, असा विचार मनात आला आणि लगेच खडावांचा आवाज आला. समोर श्रीमहाराउभे असलेले त्याने पाहिले. कपाळी केशरी गंध, गळ्यात तुळशीची माळ, अंगात कफनी आणि हातात कुबडी असे श्रींचे रूप पाहून गोविंदा थक्कच झाला. "मला येऊन भेट." असे बोलून श्री पाहता पाहता नाहीसे झाले. योगायोगाने श्रींची भेट झाली. श्रींना पाहताच गोविंदाचे मन शांत झाले. दुसर्‍या दिवशी गोविंदाने आईलाही श्रींच्या दर्शनास नेले. दोघांनाही अनुग्रह देऊन रामसेवा करण्यास सांगितले. पुढे इंदूर सोडताना श्रींनी दोघांनाही बडवई येथे जाण्यास सांगून ३॥ कोटी जप करण्याची आज्ञा केली. बडवईला गोविंदा ४/४॥ वर्षे राहिला. तेथे श्रींचे पत्र गोविंदाला आले. त्यात "आनंदसागर " असा उल्लेख करण्यात आला होता. जप पुरा झाल्यावर श्रींनी त्याला अंबडला पाठविले. पुढे श्रींच्या आज्ञेवरून आनंदसागरांनी जालना येथे श्रीराममंदिर स्थापन केले व केवळ भिक्षेवर चालविले. आनंदसागर हे श्रींचे पहिले पटटशिष्य. श्री इंदूरला असतानाच भैय्यासाहेब मोडकांकडे अनंतशास्त्री ( ब्रह्यानंद ) यांची गाठ पडली. परंतु पहिल्या भेटीत त्यांना सदूगुरूंची ओळख पटली नाही. ते पुन्हा नरसोबाच्या वाडीला आले. तेथे श्रीदत्तांचा त्यांना पुन्हा द्दष्टांत झाला. ते पुन्हा इंदूरला गेले. तेथे श्री भेटल्यावर कोणताही विकल्प मनात न आणता श्रींच्या पायावर डोके ठेवले व आपली विद्या घेतली असे श्रींनी म्हटल्यावरच आपण पायावरून डोके उचलू अशी श्रींना विनंती केली. श्रींनी ’ घेतली ’ असे म्हटल्यावर अनंतशास्त्र्यांनी डोके उचलले. श्रींनी त्यांना उचलून पोटाशी धरले. त्यांना अनुग्रह देऊन त्यांचे नाव "ब्रह्यानंद " ठेवले. कर्नाटकात जाऊन रामनामाचा प्रसार कर म्हणून सांगितलेव राममंदिर बांधण्याचे सुचविले. त्या आधी नर्मदाकाठी सर्पेश्र्वरीस जाऊन राहण्याची आज्ञा केली, तेथे २॥ वर्षे राहून तप केल्यावर त्यांचा ग्रंथिभेद झाला आणि अष्टसात्त्विक भाव प्राप्त झाले. ते लगेच गोंदवल्यास जाऊन श्रींना भेटले. श्रींनी त्यांना एक रुपया लक्ष्मीचा प्रसाद म्हणून दिला आणि ’ झाडाखाली झाड वाढत नाही ’ असे सांगून कर्नाटकात धाडले. अशा रीतीने
’ आनंदसागर ’ व ’ ब्रह्यानंद ’ यांची भेट प्रथम इंदूरला श्री असताना झाली. ज्या ज्या माणसांचा श्रींशी सहवास झाला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. सिद्धिसाठी सहवास करणार्‍या योग्यांना त्यांनी नामाचे महत्त्व पटवून देऊन भक्तीच्या मार्गास लावले. श्रीमंत, अधिकारी व विद्वान अशा अनेक लोकांना त्यांनी नामाला लावले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel